शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. जन्मापासून अंतापर्यंत शिकण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. या प्रवासात अनेक गुरू लाभतात. चांगल्या वाईटाचा नकळत आपल्यावर प्रभाव पडतो व त्यातून आपले आचरण घडते. जिज्ञासेपोटी आपण काहीतरी नवीन आत्मसात करतो. सारासार विचार करण्याची क्षमता निसर्ग, व्यक्ती, चांगली पुस्तके यांच्याकडून घेतलेल्या अनुभूतीतून मिळते. तसेच अनुभूतीतून मिळणारी अनुभूती हीसुद्धा खूप काही शिकवून जाते.
'शिक्षण म्हणजे.... ' हे श्री. अमर घाटगे, केंद्रप्रमुख, शिरगाव, रत्नागिरी यांचं पुस्तक वाचलं.श्री. घाटगे सर म्हणजे आपल्या वाणीने व लेखणीने प्रभावित करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असे सर्वपरिचित. त्यांची नेटकी भाषाशैली वाचकांना प्रेरणा देणारी ठरेल हे नक्की. आटोपशीर सहज हाताळण्याजोगं तसेच मुखपृष्ठावरील बालचमूंच्या रंगीत शृंखलेने सजलेलं हया पुस्तकाने लक्ष वेधून घेतलं. मान्यवरांच्या प्रस्तावनेवरून खूप छान विचार वाचायला मिळणार याची जणू खात्री झाली. १२९ पर्णात सामावलेल्या या पुस्तकात ५८ भागात शिक्षणविषयक विचारांना स्वानुभवाची सांगड घालत छान शब्दबद्ध केले आहे. छोट्या -छोट्या घटकांतून मार्मिक चिंतनशील विचार दिले आहेत.
पिता व मुलीचं हळवं नातं जणू आपल्यासमोर उलगडलं आहे. मुलीचे प्रश्न, तिची जिज्ञासा त्यातून त्यांचं पिता म्हणून घडत जाणे हे फार संवेदनशीलपणे मांडलं आहे. मुलांचं निरागस बाल्य जपण्यासाठी पालकांनी व्यस्ततेतूनही वेळ देणं, जागरूकपणे त्यांना समजून घेणं, त्यांचे भावविश्व जपणं ही मुलांची गरज तर आहेच शिवाय हक्कही आहे ही बाब ठळकपणे अधोरेखित व्हायला मदत होते.
जिल्हा परिषद शाळेतून व मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण मुलं किती सहजतेने आत्मसात करतात हे स्वानुभवातून सांगितले आहे.घेतलेल्या ज्ञानाचं व्यवहारात उपयोजन करता येणं म्हणजे शिक्षण. प्रेम वाटायला, मदत करायला, जातधर्म विसरायला, आदर करायला, आनंदाने जगायला शिकवतं ते शिक्षण असा फार सुंदर व व्यापक विचार आपणांस चिंतन करायला लावणारा आहे.
एक शिक्षक म्हणून व एक अधिकारी म्हणून स्वतःच्या कारकिर्दीचा परामर्श घेताना आपण अधिकाऱ्यांचे शिक्षकांशी, मुलांशी नातं हुकूमशहा असं न राहता मैत्रीचं व मनमोकळं असल्यास शिक्षण प्रक्रिया आनंददायी होईल हा स्तुत्य संदेशही देऊन जाता. निर्भय वातावरणात खऱ्या अर्थाने शिक्षण रुजेल, उमलेल व फुलेलही हा विचार मिळाला.
घेतलेल्या अनुभवांना विचारांची सांगड घातली तर चांगली मूल्ये रुजवायला मदत होते. अशा चांगल्या विचारांची पेरणी करणारे आपल्यासारखे शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ आज समाजात आहेत म्हणूनच शिक्षण समाजपरिवर्तनाचे माध्यम आहे याची साक्ष पटते.
मुग्धा कुळये
रत्नागिरी.
Saturday, February 16, 2019
'शिक्षण म्हणजे......'
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment